










नाशिकमध्ये कार्यरत असलेली महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) ही केवळ धरणेच नाही तर राज्यभरातील बांधकामांचा मेंदू आहे. अतिशय शिस्तबद्ध असे मेरीचे कार्य आहे. संशोधन, अभ्यास आणि प्रशिक्षण या त्रिसूत्रीवर मेरीने आपले वेगळेपण प्रस्थापित केले आहे.
राज्यभरात जी काही धरणे बांधली जातात त्याचे संपूर्ण श्रेय हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) संस्थेला जाते. केवळ एवढी एकच ओळख या संस्थेची राज्यभरात आहे. पण, मेरी केवळ तेवढेच कार्य करते का? तर नाही. मेरीच्या कार्याची ओळख करुन घेताना राज्याच्या विकासातील तिचे योगदान तर कळून चुकतेच शिवाय मेरीविषयी आपल्याला मोठा आदर वाटायला लागतो. एखादी प्रशासकीय संस्था मैलाचा दगड ठरावे, असे कार्य किती व कसे करु शकते, याचा प्रत्यय मेरी देत आहे. राज्यभरात रस्ते, धरण आणि इतरही बांधकामे सरकारला करावी लागतात. त्यामुळे या कामांसाठी अभ्यास आणि संशोधन करणारी मातृसंस्था असावी असा विचार पन्नासच्या दशकात आला. यावर बराच खल झाला. संस्था कशी असावी, काय नसावे आणि इतरही बाबींवर मोठा खल झाला. अखेर १९५९ मध्ये मेरीची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली.